जळगाव : हंगामाच्या सुरवातीपासून ते आता अंतिम टप्यात कापसाचे दर टिकून आहेत. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक उलथापालथी झाल्यानंतरही स्थानिक पातळीवर आजही कापूस १० हजाराच्या पार आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. पण कापसाच्या भावाने शेतकर्यांना तारले. गत ५० वर्षात शेतकर्यांना जो भाव मिळाला नाही तो भाव यंदा कापूस उत्पादक शेतकर्यांना मिळाल्यामुळे झालेले नुकसान भरुन निघाले आहे.
वाढत्या मागणीमुळे व्यापार्यांनी थेट शेतकर्यांच्या दारात जाऊन कापसाची खरेदी केली आहे. शिवाय जागोजागी खरेदी केंद्रही उभारले गेले होते. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अजूनही कमाल दरात वाढ होत असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
मुख्य कापूस हंगाम संपला तरी फरदडच्या माध्यमातून कापसाचे उत्पादन घेण्याची शेतकर्यांची परंपरा आहे. हे जरी नुकसानीचे असले तरी शेतकरी उत्पादन घेतातच. यातच यंदा विक्रमी दर मिळत आहे शिवाय शेतकर्यांकडे पाणीसाठाही उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी देऊन पुन्हा कापसाचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दर टिकून राहणार असल्यानेच शेतकरी हे धाडस करीत आहेत.
हे देखील वाचा :