भंडारा : भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाबाबच प्रश्न उपस्थित झाला आहे. भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक व भाजीपाला उत्पादक संकटत सापडले आहेत. अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली असली तरी भंडारा जिल्ह्यामध्ये संततधार ही सुरुच आहे. त्यामुळे वांग्याची रोपे ही जागेवर कुजली आहेत तर दुसरीकडे धान लागवड ही वेळत होत नसल्याने उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे.
भंडारा जिल्ह्यात धान या मुख्य पीकाबरोबर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात वांग्याची लागवड केली होती. शिवाय लागवडीपासून पोषक वातावरण असल्याने वाढही जोमात झाली. मात्र, ऐन वांगी लागवडीच्या दरम्यानच पावसाने असा काय धडाका सुरु केली आहे की, सबंध वावरामध्ये पाणी साचून राहिलेले आहे. एक-दोन दिवस पाणी साचले असते तर उत्पादनावर परिणाम झाला नसता पण गेल्या १० दिवसांपासून पीक पाण्यात आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. अधिकच्या पावसामुळे मुख्य पिकांवर तर परिणाम झालाच आहे. पण भाजीपाल्याचे देखील न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
यंदा शेती व्यवसायाबाबत सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. हंगामाच्या सुरवातीलाच अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी किंवा भाजीपाल्याची पुन्हा लागवड ही शक्य होणार नाही. शिवाय पेरणी आणि मशागतीवर शेतकर्यांचा लाखोंचा खर्च झाला आहे. खरीप हंगामातील पिकांची पाहणी करुन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.