पुणे : रशिया-युक्रेन युध्दामुळे खरिप हंगामात खत टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, रासायनिक खतांसाठी लागणारा कच्चा माल हा या दोन्ही देशांमधून मोठ्या प्रमाणत आयात केला जातो. मात्र आता कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने खत टंचाई अटळ मानली जात आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजनला सुरुवात झाली आहे.
रासायनिक खत विक्रेत्यांना आधार कार्ड धारक शेतकर्यांना ई-पॉस मशीनद्वारेच खतांची विक्री करावी लागणार आहे. शिवाय एमआरपी पेक्षा जास्त किमतीने खताची विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे खताची टंचाई निर्माण झाली तरी त्याची अधिकची झळ बसू नये यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. यादृष्टीने तालुकानिहाय बैठका घेण्याच्या सुचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
शेतकर्यांनो याकडे लक्ष द्या
यंदा खरिपात सर्वच प्रकारच्या खताचा पुरवठा होईल याबाबत ठोस माहिती कृषी विभागही देवू शकत नाही. त्यामुळे सध्या बाजारपेठेत असलेल्या खते शेतकर्यांनी आताच खरेदी करुन ठेवणे गरजेचे आहे. जून व जुलैमधील मंजूर आवंटन एप्रिल व मे महिन्यात प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न कृषी विभाग करणार आहे. डीएपी खताचा साठा विक्रत्यांकडे असेल तर तात्काळ त्याची विक्री करावी लागणार आहे. याला पर्याय म्हणून ३ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व २० किलो युरिया वापरासाठी जनजागृती महत्वाची राहणार आहे.
बोगस खतांपासून सावधान रहा
दरवर्षी बोगस खतातून शेतकर्यांची फसवणूक होते. यंदा खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर बोगस खत विक्रीचे संकट देखील वाढण्याची शक्यता आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा निहाय पथके नेमण्यात येणार आहेत. आहे तो साठा शेतकर्यांपर्यंत पोहचावा आणि शेतकर्यांची फसवणूक होऊ नये ही जबाबदारी पथकांची राहणार आहे.
हे पण वाचा :