नाशिक : ऊसानंतर कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. मात्र गेल्या ५ महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण सुरु आहे. घटत्या दरामुळे शेतकर्यांचे वांदे होत असल्याने आता व्यापारी आणि ग्राहकांचेच वांदे करण्याचा निर्णय शेतकर्यांनी घेतला आहे. कांद्याला किमान २५ रुपये किलो दर न मिळाल्यास शेतकर्यांनी कांदा विक्रीच करु नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक ही घटली तर दुसरीकडे कांद्याला किमान ३० रुपये किलो असा दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राहुरी शहरातील नगर-मनमाड या महामार्गावर रास्तारोको केला होता.
कांद्याच्या दराचा होणार वांधा हा विषय नेहमीचाच झाला आहे. सुरुवातीला २५ ते ३० रुपये प्रति किलो असलेले कांद्याचे दर उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात दाखल होताच चक्क २ ते ३ रुपये प्रति किलोपर्यंत घसरले. मध्यंतरी नाफेड कांद्याची खरेदी केली तेव्हाच शेतकर्यांना सरासरीप्रमाणे दर मिळाला. नाफेडचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर त्यांनी खरेदी बंद करताच पुन्हा दरात कमालीची घसरण झाली.
सध्या खरीप हंगामतील कांदे लागवडीची लगबग सुरु झाली आहे. तर दुसरीकडे बाजारपेठत कांद्याला केवळ १० ते १२ रुपये किलो असा दर आहे. येणार्या काळात कांद्याच्या दरामध्ये अनियमितता राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कांदा दराबाबत निर्णय घ्यावा अन्यथा १६ ऑगस्टपासून शेतकर्यांनी कांदा विक्रीसाठीच आणू नये असे आवाहन कांदा उत्पादक संघटनेने केले होते. त्याला प्रतिसादही मिळाला आहे.