औरंगाबाद : सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागांमध्ये मर रोगाचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: जालना जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक असून येथे बागेतील बहर आलेली अनेक झाडे ही वाळत आहेत. मर रोगामुळे मोसंबीची झाडे ही बुडापासूनच वाळत आहेत. त्यामुळे खरीप हंगामाबरोबर आता मोसंबीच्या बागा वाचवण्याचेही आव्हान शेतकर्यांसमोर उभे ठाकले आहे.
मराठवाडा विभागात ४९ हजार हेक्टर क्षेत्रफळलावर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. मात्र मराठवाड्यातील बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर आणि क्षेत्रावर देखील होऊ लागला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत अडकले आहेत. फळबागा वाचवण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरु झाली आहे.
मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा झाडे सुकण्यास सुरवात झाली की शेतकर्यांनी प्रथम झाडावरील सर्व फळे ताबडतोब काढून त्यावर बुरशीनाशक फवारणे गरजेचे आहे. हा प्रकार जवळ-जवळ लागवड, रासायनिक खतांचा मारा, सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता, प्रकाश संश्लेषण कमी मिळणे, खोडांना इजा होणे, ज्यादा पाणी देणे यामुळेच मर रोगाची लागण होते. शिवाय यामुळे उत्पादनातही घट होत असल्याचे कृषितज्ञांचे म्हणणे आहे.