पुणे : प्रत्येक हंगामात बोगस बियाणे व खतांचा विषय चर्चेत असतो. यात अनेक शेतकर्यांची फसवणूक होवून त्यांचे आर्थिक नुकसान देखील होत असते. आताही खरीप हंगाम तोंडावर असतांना बोगस मिश्र खतांचा प्रकार समोर आला आहे. राज्यातील ६ खत कंपन्यांकडून अवैध कागदपत्रांची जुळवाजुळव करुन खताची विक्री, अनाधिकृत खताचा साठा अशा एक ना अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ६ कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी खत खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
राज्यात मिश्र खताची निर्मिती करणार्या ६ कंपन्या समोर आल्या आहेत. यामध्ये सांगली येथील लोकमंगल कंपनी, तसेच येथीलच वसंत अग्रो टेक, नागपूरातील विदर्भ मार्केटींग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ, औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर अशी या कंपन्यांची नावे आहेत. कारवाईच्या अनुशंगाने केंद्रातील सहसचिव नीरजा आदीदम यांनी राज्याला एका पत्राद्वारे ही कारवाईचे आदेश दिले गेले आहेत.
शेतकर्यांकडून एकाच खताची अधिकची मागणी होते. त्यामुळे कृत्रिम तुटवडा भासून शेतकर्यांची अडवणूक केली जाते. आता तर मिश्र खताचा सुळसुळाट सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेतकर्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे.