लातूर : गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दरांमध्ये सातत्याने घसरण होत होती. अखेर आठ दिवसांनी का होईना सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. सोयापेंडच्या आयातीला पूर्णविराम मिळाला असताना देखील दरात वाढ होत नव्हती उलट घसरण सुरु होती. एकीकडे आवक वाढत असताना दर घटत असल्याने नेमका काय निर्णय घ्यावा या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी होते. मात्र सोयाबीनच्या दररातील घसण ही पूर्णपणे कृत्रिम असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सोयाबीनच्या अनिश्चिततेमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची साठवणूक केली आहे. आता सोयाबीनचे दर वाढल्याने बाजारात सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उन्हाळी सोयाबीन दाखल होण्यापूर्वी खरीपातील सोयाबीनचे भाव असेच वाढत राहिले तर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन निघणार आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बियाणाच्या सोयाबीनला ७ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे तर नियमित असलेल्या सोयाबीनच्या दरात शुक्रवारी ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोयाबीनच्या दरात अणखीन वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.