जळगाव : कापसावरील गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी किमान जमीनीत मुरण्याइतका पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी हंगाम सुरु झाल्यावरच बियाणांच्या विक्री करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. मात्र कृषी विभागाच्या या धोरणामुळे बियाण्यांचा काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे.
कापसाची लागवड लवकर झाली तर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो हे यापूर्वीच सिध्द झाले आहे. त्यामुळे लवकर बियाणे उपलब्ध करुन न देण्याच्या भुमिकेवर कृषी विभाग ठाम आहे. हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत १ ते १० मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून १५ मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकर्यांना १ जून नंतर विक्री केले जाणार आहे, असे कृषी विभागाचे नियोजन आहे.
मात्र ज्या शेतकर्यांकडे पाणी आहे किंवा बागायती भागात काहीही झाले तरी शेतकरी लवकरच कापसाची लागवड करतात. जर वेळेवर कापूस बियाणे मिळाले नाहीतर इतर मार्गाने बियाणे मिळवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कापसाच्या बियाणामध्ये काळाबाजार होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकर्यांमध्ये कमालीचे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.