खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्वाची पिके गणली जातात. या दोन्ही पिकांची मिळुन महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ७ ते ८ लाख हेक्टर क्षेत्रावर शेती होते. मूग आणि उडीद ही ७० ते ८० दिवसांत येणारी पिके असल्यामुळे थोडयाशा पावसात देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी ही दोन्ही पिके अतिशय महत्तवाची आहेत.
जमिन:
मुग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमिन आवश्यक असते. पाणी साचुन राहणारी क्षाररपड, चोपण, किंवा हलकी जमीन टाळावी.
पूर्वमशागत :
चांगली पूर्वमशागत ही मुग आणि उडीदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. ती चांगली तापु द्यावी आणि पावसाळा सुरु होताच कुळवाच्या पाळ्या घ्याव्यात. काडी, कचरा, धसकटे वेचुन घ्यावीत. याच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
पेरणीची वेळ :
मुग आणि उडीद ही दोन्ही पिके खरीप हंगामातील आहेत. त्यामुळे मान्सुनचा पाहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनित वापसा येताच म्हणजे जुनचा दुसरा पंधरवाडामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते.
सुधारित वाण :
मुगामध्ये अनेक वाण उपलब्ध आहेत यातील वैभव हा वाण खरीप व उन्हाळी या दोन्ही हंगामासाठी उपायुक्त आहे. मुगामध्ये वैभव व बी. पी. एम. आर. १४५ हे दोन वाण रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे चांगले वाण आहेत. हे दोन्ही वाण भुरी रोगाला प्रतिकारक आहेत आणि कोपरगांव या पारंपारिक वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारे आहेत. कोपरगांव- १ हा मुगाचा जुना वाण असुन त्यावर भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे हा वाण घेण्याचे टाळावे. उडीदामध्ये काही मोजकेच वाण आहेत. त्यापैकी टीपीयु-४, टीएयु १ हे दोन वाण उत्कृष्ट गणले जातात. टीपीयु-४ व टीएयु-१ हे दोन्ही टपोऱ्या काळ्या दाण्यांचे वाण असुन पक्वतेचा कालावधी ७० ते ८५ दिवसांचा आहे.
बीजप्रक्रिया :
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणुवाचा पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळुन लावावी. मूग, उडीद, या पिकांच्या बियाणासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणु सवंर्धन वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियम मुळे मुळावरील गाठी वाढून नत्राचा उपलब्धता वाढते.
पेरणीचे अंतर :
मुग आणि उडिद ही पिके अतिशय कमी कालावधीची (७० ते ८० दिवस) असल्यामुळे सलग अथवा आतंरपिक म्हणुन घेतले जाते. या दोन्ही पिकांचे पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. व दोन रोपांमधील अंतर १० से.मी. राहील या बेताने पेरणी करावी. पेरणी पाभरीणे करणे चांगले. या पिकांमध्ये तुरीचे आंतरपिक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकांच्या दोन चार ओळीनंतर एक तुरीची पेरणी करावी. बियाणे प्रमाण १५-२० किलो/हेक्टर
खतमात्रा :
या दोन्ही पिकांना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. शक्यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळुन बियानालगत पेरून द्यावी म्हणजे त्याचा प्रभाव चांगला होतो..
आंतरमशागत :
सुरुवातीपासूनच पिक तणविरहीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे. पीक २० ते २५ दिवसांचे असतांना पाहिली आणि ३०-३५ दिवसांचे असतांना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी, कोळपणी नंतर दोन रोपांतील तल काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. ही पिके ३०-४५ दिवस तण विरहीत ठेवणे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक असते.
पाणी व्यावस्थापन :
ही पिकेसर्वस्वी पावसावर येणारी आहेत. या पिकांना फुले येतांना आणि शेंगा भरताना ओल्याव्याची करमतरता भासु लागते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खुपच कमी झाला असेल तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे. किंवा २% युरियाची फवारणी करावी.
टोमॅटो पिकावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन
करडई लागवडीचे सुधारीत तंत्रज्ञान, असे घ्या जास्त उत्पादन
वाटाणा लागवडीसाठी हे तंत्रज्ञान वापरा अन् बंपर उत्पादन मिळवा
शेतकर्यांनो ऊस लागवडीपूर्वी हे गणित समजून घ्या, अन्यथा होवू शकतो मनस्ताप
कोथिंबीरच्या बंपर उत्पादनासाठी अशा पध्दतीने करा लागवड
उन्हाळी कांदा लागवडीसाठी तज्ञांचा ‘हा’ आहे सल्ला
पीक संरक्षण :
मुगावर रस शोषणाच्या किडी आणि उडीदावर केसाळ अळ्या यांचा प्रादुर्भाव होतो. उडीदा वरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५% ई.सी. १००० मिली ५०० लिटर पाण्यापासुन फवारावे. एखाद्या झाडावर केसळ अळ्यांच्या प्रार्दुभाव दिसताच ती झाडे उपटावीत व सर्व अळ्या टाकाव्यात. या पिकांवर प्रामुख्याने भुरी आणि पिवळा विषाणु या रोगांचा प्रार्दुभाव आढळुन येतो. भुरी रोगाच्या प्रार्दुभावामुळे पिकाच्या खालील पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. तसेच पिक्ळा विषणु या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडीमार्फत होतो. या रोगांमुळे कोवळ्या पानावर लहान पिवळे ठिपके दिसतात व थोड्याच दिवसात पानांच्या बऱ्याचश्या भागावर अनियमित अकाराचे चट्टे दिसु लागतात.
यामुळे उत्पादनात घट होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिळसणारे गंधक १२५० ग्रॅम किंवा ५०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम ५०० लिटर पाण्यातुन प्रति हेक्टरी फवारावे. आवश्यकता भासल्यास ८-१० दिवसांनी आणखी एक फवारणी करावी. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी फोरेट १० टक्के दाणेदार १० किलप प्रति हेक्टर प्रार्दुभाव दिसु लागताच धुरळणी करावी. तसेच शेंगा पोखरणाऱ्या किडींच्या नियांत्रणासाठी क्लोरान्टानीलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २ मिली अथवा फ्ल्युबेडमाईड ३९.३५ टक्के प्रवाही २ मिली अथवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १२.५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन प्रादुर्भाव दिसु लागताच यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
काढणी:
मूगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यानंतर पाहिली तोडणी व त्या नंतर ८-१० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळवल्यावर मळणी करावी. उडीदाची कापणी करुन खळ्यावर आणून त्याची मळणी करावी. उडीदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही. साठवणीपुर्वा मुग व उडीद धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट व ओलसर जगेत करु नये. साठवताना कडुनिंबाचा पाला (५ज्ञ) धान्यात मिसळावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.
उत्पादन :
अशा प्रकारे चांगली काळजी घेऊन वाढविलेल्या पिकापासुन मूगाचे १२ ते १५ क्विंटल तर उडीदाचे १० ते १२ क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.
(साभार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2020-21, माहिती पुस्तिका – लागवड व तंत्रज्ञान)
हे देखील वाचा :